जयंत पाटलांच्या किल्ल्यात पाय रोवण्याची संधी काँग्रेसने घालवली; विश्वजीत कदम, विशाल पाटील तोंडघशी

ईश्‍वरपुर येथील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे हात चिन्ह गायब झाले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, आमदार विश्‍वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासमवेतच्या बैठकीत तीन जागा व स्वीकृत सदस्यपदी संधी देण्याबाबत एकमत झाले होते.

यामुळे जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्याची काँग्रेसकडे सुवर्ण संधी होती. पण अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्याकडून एबी फॉर्म येणार होते. मात्र दुपारी तीनपर्यंत अर्जच न आल्याने शेवटी या निवडणुकीत ईश्‍वरपुरातून हात चिन्हच गायब झाले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, ईश्‍वरपुरात महाआघाडी होणार की नाही, याबाबत पहिल्यापासून साशंकता होती. स्थानिक पातळीवर आघाडी होणार किंवा नाही. शहरातील काँग्रेस कार्यालय ताब्यात देण्याबाबत स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेली अनेक वर्षे वाद सुरू आहे. स्थानिक नेत्यांनी आठवडाभरापूर्वी विश्‍वजित कदम यांची भेट घेत यावेळी लढायचेच, असा निर्धार केला विश्‍वजित कदम यांनीही सर्व काही बळ देऊ असा शब्द दिला.

मात्र चर्चा काही पुढे जात नव्हती. शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे धाव घेतली. तिथे झालेल्या बैठकीत सपकाळ आणि रजनी पाटील यांनी कदम यांना कार्यकर्त्यांना बळ द्या, अशी स्पष्ट सूचना केली. त्यानुसार पुन्हा ईश्‍वरपुरात बैठक झाली. या बैठकीत तीन जागा व एक स्वीकृत जागेचा शब्द दिला. कार्यकर्त्यांनी त्याला मान्यता दिली. आणि नेत्यांनी अर्ज भरण्यापूर्वी एबी फॉर्म पाठवले जातील असा शब्द दिला.

ईश्‍वरपुरातील कार्यकर्ते मंगळवारी (ता.18 नोव्हेंबर ) आठपासूनच एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत होते. अर्ज घेऊन कार्यकर्ते निघाले आहेत. लवकरच पोहोचतील असे जिल्हाध्यक्ष सावंत यांच्याकडून निरोप दिले जात होते. परंतू ते स्वतः जतच्या निवडणुकीच्या धामधुमीत होते. दुपारी तीन वाजले तरी अर्ज पोहोचले नाहीत. त्यामुळे काँग्रेस इच्छुकांना एबी फॉर्मविनाच अर्ज दाखल करावे लागले. आता ते अपक्ष म्हणून लढणार की नाही की स्वीकृतच्या सदस्यत्वाची प्रतीक्षा पाहणार? हे स्पष्ट होईल.