शहर परिसरासह जिल्हयातील सर्वच साखर कारखान्याचे ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे आता बैलगाडी, ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रकमधून मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक होताना दिसून येत आहे. मात्र, अनेक चालक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवताना दिसतात. त्यामुळे एखादा अपघात होऊन जिवीत हानी होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तेव्हा ऊस गाळप हंगाम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण कक्षाने नियमावली लागू करावी अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
विविध साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला की, मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक दिसून येते. बैलगाडीवरून ऊसाची वाहतूक एकमार्गी होताना दिसते. परंतू अनेक गाडीमालक प्रमाणापेक्षा जादा ऊस भरल्याने चढतीच्या वेळी व उतरतीच्यावेळी बैलगाडीचा अपघात होण्याची भिती असते. तेव्हा नियमापेक्षा कमी ऊस वाहतूक करण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. इचलकरंजी शहर परिसरात काही अंतरावर लहान-मोठे पाच-सहा कारखाने आहेत. त्यामुळे इचलकरंजीतून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. शहरातून ऊस वाहतूक सुरळीतपणे व्हावी यासाठी वाहतूक पोलासांनी काही नियम अटी घालून दिल्या आहेत. त्यामध्ये शहरातील काही ठरावीक रस्त्यावरून वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. तसेच बहुसंख्य वाहनधारक नियमांचे उल्लंघन करून रिप्लेक्टर न लावता भरधाव वेगाने वाहन चालवताना दिसतात. त्यामुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नियम तोडणाऱ्यावर तात्पुरती कारवाई करून सोडले जाते. अशा प्रकारामुळे पुन्हा एखादा अपघात होण्याची भिती व्यक्त केली जाते. तेव्हा सुरळीत वाहतूक करणेसाठी कडक नियमांची अमंलबजावणी कराची अशी मागणी होत आहे.
बेदरकार वाहन… कर्णकर्कश गाणी !
बहुतांशी ट्रक, टॅक्टर-ट्रॉली चालक वाहनाचा त्रास होऊ नये यासाठी रात्रीच्यावेळी ऊसाची वाहतूक करतात. मात्र, अनेक बहादुर ट्रॅक्टर-ट्रॉली वाहन चालक बेदरकारपणे वाहन चालवताना दिसतात. तर बाहनावर मोठ्या कर्णकर्कश आवाजात गाणी लावत असत्त्याने मागून कोणते वाहन येत आहे हे लक्षात येत नसल्याने अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.महासत्ता चौक अपघाताचा स्पॉट महासत्ता चौकातून राजवाडा चौकाकडे जात असताना अनेक वेळा ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली चढतीला ओव्हरलोड वाहतूकीमुळे पलटी झाल्याचे उदाहरण आहे. तेव्हा अशा रस्त्यावरून ऊस वाहतूक करण्यास बंदी घालावी अशी मागणी होत आहे.
