कोल्हापूर, सांगलीच्या पुराचे पाणी मिळणार आता….

कोल्हापूर, सांगली भागांतील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात हे अतिरिक्त पाणी दुष्काळी मराठवाड्याकडे वळवणे, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अर्थसाह्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात याच उद्देशाने कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प आखला होता. या निर्णयामुळे आता तो प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबद्दल जागतिक बँक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानताना, मोठे साह्य झाल्याचे यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.

महाराष्ट्रात एकीकडे तीव्र दुष्काळ तर दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते. हवामान बदलाबाबत व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची हीच वेळ आहे. अनेक जागतिक संस्थांच्या गाठीशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव गाठीशी असतो. अशावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाचवेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतो, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामे करणे शक्य होणार आहे. पूररेषा आखणे, नदी खोलीकरण, गाळ काढणे अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत. निती आयोगाने सुद्धा याबाबत पूरक अहवाल दिला होता.

एकीकृत जलव्यवस्थापन आणि देखरेख प्रणालीतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणेसुद्धा यातून शक्य होणार आहे. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही क्षेत्रांना या प्रकल्पातून मोठा लाभ होईल, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.