पेठ (ता. वाळवा) येथील एका कॉलेजवर सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या वादातून विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. या हल्ल्यात शुभम संजय सावंत (वय 19, रा.काळमवाडी, ता. वाळवा) हा जखमी झाला आहे. त्याने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तिघांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
अविनाश दादासोा जाधव (रा. ढोलेवाडी, ता. कवठेमहांकाळ), वरद दिलीप कदम (रा. पद्माळे, ता. मिरज), जयंत प्रदीप भोई (रा. हरिपूर, ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सकाळी पेठ नाका येथील महाविद्यालयात झोनल कबड्डी स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मिरज आणि राजारामनगर येथील कॉलेजदरम्यान सामना सुरू होता.
मिरज येथील संघ पराभूत झाल्याने वाद झाला. सामन्यातील पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करत पंचावर हल्ला करण्यासाठी वरद व जयंत हे दोघे धावले. हा वाद सोडविण्यासाठी शुभम सावंत, त्याचे मित्र संचित जाधव, आदित्य पवार, राजवर्धन पाटील तसेच काही शिक्षक गेले होते. त्यावेळी मिरज संघातील अविनाश दादासाो जाधव याने त्याच्या कमरेचा चाकू काढून शुभम सावंत याच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. जाधवसोबत असलेले वरद आणि जयंत यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. जखमी शुभम सावंत याला मित्रांनी तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
