ईश्वरपूर येथे दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

इश्वरपूर : पेठ- सांगली रस्त्यावर ईश्वरपूर बसस्थानक परिसरात दुचाकीच्या धडकेत पादचारी ध्रुवकुमार मधुकर कदम (वय 50 रा. मसुचीवाडी) यांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवार, 16 रोजी सकाळी घडला.

अपघातात दुचाकी चालक संग्राम रामदास पाटील (वय 24 रा. बुधगाव ता. मिरज) गंभीर जखमी झाला.

सोमवारी सकाळी ध्रुवकुमार हे गावातून बसने ईश्वरपूर येथे गेले होते. ते बसस्थानकातून बाहेर पडून चालत निघाले होते. यावेळी पेठकडून संग्राम दुचाकीवरून (एमएच 10 एटी 5767) येत होता. त्याची ध्रुवकुमार यांना जोराची धडक बसली. धडकेत ध्रुवकुमार रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. दुचाकी चालक संग्राम हादेखील गंभीर जखमी झाला. दोघांना ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ध्रुवकुमार यांचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी संग्राम याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद ईश्वरपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. ध्रुवकुमार यांचा भाऊ प्रताप यांनी फिर्याद दिली. ध्रुवकुमार हे दिव्यांग होते. त्यांना दिव्यांग पेन्शन सुरू होती. सोमवारी सकाळी ते बँकेतून पेन्शन आणण्यासाठी ईश्वरपूरला गेले होते. बँकेकडे जात असतानाच अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. ध्रुवकुमार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.