2 वर्ष लाईट नाहीत, खाण्या पिण्याचे वांदे, उपासमारीची वेळ ! आंतरजातीय विवाहामुळे सामाजिक बहिष्कार, दांपत्याची व्यथा ऐकून डोळ्यांत येईल पाणी

लग्न… दोन जीवाचं लग्न होत असलं तरी ते दोन कुटुंबानांही एकत्र आणतं. आपल्याकडे लग्न म्हणजे 7 जन्मांचं बंधन मानलं जातं. पण हेच लग्न एखाद्याच्या मुळावर उठत असेल तर ? लग्न केलं म्हणून जर एखाद्याला वाळीत टाकून, त्यांच्यावर बहिष्कार टाकून, जगण नकोसं करत असतील तर ? लव्ह मॅरेज केलं, आंतरजातीय विवाह केला म्हणऊन एखाद्या कुटुंबावर पूर्णपणे बहिष्कार टाकून, त्यांना त्रास दिल्याची घटना, आज य़ा 21 व्या शतकाहीतही घडली आहे. पुरोगामी राज्य म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात, हा प्रकार घडलाय.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या सरडपार गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. तिथे राहणाऱ्या सचिन आणि सुजाता यांना लग्नाची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. आम्ही आंतरजातीय विवाह केला त्यामुळे आमच्या कुटुंबियांसह संपूर्ण गावाने आमच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला असा आरोप सचिन व सुजाता यांनी केला आहे. गेल्या 2 वर्षांपासून ही परिस्थिती असून त्यामुळे कोणी बोलत नाही, कुठेही कार्यक्रमात आम्हाला बोलावत नाहीत, एवढंच काय गेल्या 2 वर्षांपासून आम्चाया घरात साधे लाईटही नाही अशा शब्दांत या जोडप्याने आपली आपबिती सांगितली. गावच्या या बहिष्कारामुळे त्यांना दोन वेळच्या जेवणाचीदेखील भ्रांत सतावते.

काय आहे प्रकरण ?

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या सरडपार गावात राहणारे सचिन आणि सुजाता यांचंलग्न झालं. सचिन हे अनुसूचित जातीतले आहेत तर सुजाता या अनुसूचित जमातीतील आहे, अशी माहिती समोर आली आहे. तीनेक वर्षांपूर्वी म्हणजेच मे 2023 मध्ये त्या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. त्यांचा आंतरजातीय विवाह होता. मात्र त्यांच्या घरच्यांना हे पसंत नव्हतं. त्यावरून कुटुंबियांमध्ये वाद सुरू झाले. सचिन यांची आई व भाऊ यांना हे लग्न मान्य नव्हतं, वाढत्या वादानंतर सचिनची आई व भावाने त्यांचं गावातलं घर सोडलं. नंतर त्यांनी सिंदेवाही येथे आपला मुक्काम हलवला.

पण आपल्या कुटुंबियांनी गावातल्या सर्व लोकांना आपल्या वरोधात भडकावलं. त्यामुळे संपूर्ण गावाने आपल्यावर बहिष्कार टाकला असा आरोप सचिन व सुजाता यांनी केला. सगळ्या गावाने आणि विशेषत: आमच्या जातीतील लोकांनी आमच्यावर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकलाय. गेल्या दोन वर्षांपासून घरात वीज नाही, आमच्याशी कोणी बोलत नाही, कोणत्याही कार्यक्रमात आम्हाला निमंत्रण दिलं जात नाही. खाण्या-पिण्याचे हाल होता, परिस्थिती खूपच हलाखीची आहे, असं या दांपत्याने सांगितलं.

एवढंच नव्हे तर या दांपत्यच्या 1 वर्षाच्या मुलालाही या बहिष्काराची झळ पोहोचली आहे. त्या निरागस बाळाला आशा वर्करकडून कोणत्याही प्रकारची लस किंवा इतर गोळ्या दिल्या गेल्या नाही असा आरोप सचिन व सुजाताने केलाय. याप्रकरणी पलिसांकडे दाद मागितली, तरीही काही फायदा झाला नाही. आम्ही पोलिसांत अनेक वेळा तक्रार दिली, पण अद्याप यावर कुठलीही कारवाई झालेली नाही असंही त्यांनी सांगितलं.

मात्र दुसरीकडे गावातील लोकांनी या दाम्पत्यावर कुठल्याही प्रकारचा सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकण्यात आल्याच्या बाबीचा स्पष्टपणे इन्कार केला आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे.