शिट्टी वाजवा, विद्यार्थ्यांना शाळेत बोलवा! शिक्षण विभागाचा अनोखा उपक्रम

विद्यार्थ्यांची अनियमितता ही विशेषत: सरकारी शाळांसाठी समस्या बनते. शाळेत महिन्याहून अधिक काळ अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी झारखंडच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने ‘प्रयास-सिटी बजाओ, स्कूल बुलाओ’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला.

झारखंडमधील पूर्व सिंगभूम जिल्ह्यातील पोटका विभागात येणाऱ्या तांग्रेनमधील सरकारी माध्यमिक शाळेने काही दिवसांपूर्वी या उपक्रमाची अंमलबजावणी केली. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतही वाढ झाली. शिट्टीच्या आवाजामुळे शाळेत महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थित असणारे विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊ लागले, अशी माहिती शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अरविंद तिवारी यांनी दिली.

ते म्हणाले, की या उपक्रमाला आमच्या शाळेत विद्यार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन झारखंडच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये तो राबविण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर सोशल मीडियावर शिट्टी वाजविणाऱ्या विद्यार्थ्याचे छायाचित्र ‘सिटी बजाओ’ या हॅशटॅगसह शेअर करण्याच्या सूचनाही विभागाने दिल्या.

‘सीटी बजाओ, स्कूल बुलाओ’ या अनोख्या उपक्रमात गटप्रमुख इतर विद्यार्थ्यांसह गावात दररोज सकाळी शिट्ट्या वाजवित सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सूचना करतो. हा उपक्रम सुरू केल्यापासून गैरहजर विद्यार्थी पुन्हा नियमितपणे शाळेत येऊ लागले आहेत.

उपक्रमाला एवढे यश मिळाले की दीर्घकाळ शाळेत न आल्याने शाळाच सोडून दिली, असे ज्या विद्यार्थ्यांबद्दल वाटत होते, ते विद्यार्थीही पुन्हा शाळेत दाखल झाले. सोशल मीडियावर शिट्टी वाजवितानाचे छायाचित्र पोस्ट करण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत.