कोल्हापुरात दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू!

कोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी इथं एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतात गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी इथं भोसले याचं हसतं खेळतं कुटुंब होतं.

पण, त्याला काळाची नजर लागली. त्यांच्या दोन चिमुकल्यांचा (2 sisters) विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आराध्या सुरेश भोसले आणि आरोही सुरेश भोसले अशी या दोन सख्ख्या बहिणींची नावं आहेत. या दोघी बहिणी काल आपले वडील सुरेश भोसले यांच्यासोबत शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या.

तिथेच त्यांच्यावर काळाने घाला (Sisters Death) घातला.या दोघींना शेतात गेल्यानंतर काही वेळाने सुरेश भोसले यांनी घरी जाण्यास सांगितले. त्यांनंतर सुरेश यांना वाटले की मुली घरी गेल्या आहेत. त्यामुळे ते निवांतपणे आपल्या पत्नीसह उसाला पाणी देत होते. काही वेळाने उसाला पाणी पाजून झाल्यानंतर आई अश्विनी या घरी गेल्या.

मात्र, तेव्हा त्यांना आपल्या दोन्ही मुली घरी नसल्याचं समजलं. मग त्या घाबरून गेल्या. एकच धावपळ सुरू झाली. मुलींचा शोध सुरू झाला.घर आणि शेताच्या परिसरात सगळीकडे त्यांना शोधून झालं. पण, बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर मुली सापडल्या नाहीत. दरम्यान विहिरीवर दोन्ही मुलींच्या चपला दिसल्या.

त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता दोन्ही मुलीचे मृतदेह सापडले. या मुलींच्या पालकांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेमुळं भोसले कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. या मुलींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.