इचलकरंजीत जलकुंभ उभारण्यासाठी ३१ कोटी मंजूर

वस्त्र नगरी म्हणून ओळखीस असलेले इचलकरंजी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सतत चर्चेत असतेच. सध्या इचलकरंजीला पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. इचलकरंजी शहरातील विविध ठिकाणी सहा जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ३१ कोटी ३७ लाख रुपये मंजूर झाले असून, राज्य सरकारने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. शहरामध्ये दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन मी दिले आहे. ते पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

पंचगंगा आणि कृष्णा नदीवरून येणा-या जॅकवेलमधील मोटार बदलणे, केबल टाकणे, शहरातील व्हॉल्व्ह बदलणे, जलकुंभातील जलवाहिन्या बदलणे, यासाठी जिल्हा नियोजनामधून ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ते काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच राज्य सरकारकडून शहरातील सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यासाठी ३१ कोटी ३७ लाख रुपयांचा प्रस्ताव दिला होता. तो मंजूर झाला आहे.

याअंतर्गत पी. बा. पाटील मळा येथे ११ लाख लीटर- शांतीनगरमध्ये १० लाख लीटर- दत्तमंदिर जवाहरनगरजवळ १४ लाख लीटर, जुना चंदूर रोडजवळ असलेल्या शाळेच्या परिसरात लाख लीटर, तोरणानगर भागात १३ लाख लीटर आणि तुळजाभवानीनगरमध्ये १२ लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. सुळकूड संदर्भात कसा मार्ग काढायचा, याचे ठरले आहे, असे आवाडे म्हणाले.