सोलापुरात कामगार संघटनांकडून १६ फेब्रुवारीला बंदची हाक

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देशभरातील कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून यात सोलापूर जिल्हा कामगार संघटना कृती समिती देखील सहभागी होणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी दत्त नगर येथून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा मोर्चा निघणार आहे, अशी माहिती कामगार संघटना कृती समितीचे प्रमुख तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली.

वाढती मागावी रोखावी, दोन कोटी युवकांना रोजगार देणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले असून याची अंमलबजावणी करावी, विडी व यंत्रमाग कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, असंघटित कामगारांसाठी कोश्यारी कमिटीनूसार दहा हजार रुपये पेन्शन द्या यासह इतर मागण्यांसाठी १६ फेब्रुवारीला कामगारांनी संप पुकारला आहे. सीटूच्या नेतृत्वाखाली या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात येणार आहे. या बंद मध्ये विडी व यंत्रमाग उद्योगातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देखील आडम यांनी दिली.