कोल्हापुरातील अधिकाराच्या मुलाने राहत्या घरी घेतला गळफास

चाचणी परीक्षेचा ताण आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील टाकाळा येथील माळी कॉलनी परिसरातील एका १५ वर्षीय युवकाने छताला असलेल्या फॅनला ओढणी बांधून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. आई घरात नसल्याचे पाहून बेडरूममध्ये त्याने गळफास लावून घेतला. नंतर आई घरी आल्यानंतर बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने नातेवाईकांच्या व शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता मुलाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वडील बँकेत अधिकारी तर आई शिक्षिका
मिळालेल्या माहितीनुसार, टाकाळा परिसरात राहणारा हा मुलगा कोल्हापुरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील एका राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी आहेत, तर आई शिक्षिका आहे. मुलाचे सध्या शाळेत चाचणी परीक्षा सुरू असल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास आई घरी आल्यानंतर तो त्याच्या बेडरुममध्ये होता. बेडरुमचे दार उघडत नसल्याने त्यांनी पती यांना फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता, त्याने छताच्या फॅनला गळफास घेतल्याचे दिसले. गळफास सोडवून त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. मुलाने आत्महत्या केल्याचे समजताच त्याच्या आई-वडिलांना मानसिक धक्का बसला. वडिलांच्या बँकेतील सहकाऱ्यांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

चाचणी परीक्षा सुरू असल्याने तो प्रचंड तणाव
१५ वर्षीय मुलगा हा इयत्ता नववीत इंग्रजी माध्यमाच्या वर्गात शिकत होता. चाचणी परीक्षा सुरू असल्याने तो प्रचंड तणावाखाली होता. तर कालचा पेपर देखील त्याला अवघड गेला असावा यामुळे त्याने या तणावाखाली आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या दगदगीच्या आणि स्पर्धेच्या युगात आई-वडील दोघेही मुलांना सोडून कामावर जातात. यामुळे मुलांमध्ये आणि आई-वडिलांमध्ये असलेला भावनिक संबंध दुरावला जात आहे. यामुळे असे अनेक प्रकरण सध्या समोर येत असून लहान मुलांच्या भावना अडचणी समजून घेणे आणि त्यांच्यावर प्रेमाने संस्कार करणे याला अनेक जणांना वेळ मिळत नसल्याने लहान लहान मुले आता आत्महत्येचा पर्याय स्वीकारू लागले आहेत. यामुळे आई-वडील यांच्यासह परिवाराने देखील आपल्या लहान मुलांवर लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.