शेतकऱ्यांना लाखांचे कर्ज अवघ्या 10 मिनिटांत!

देशातील शेतकऱ्यांना बँका अजूनही सहज कर्ज देत नाहीत. त्यांना कारणे दाखवून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतात. ऐन गरजेच्यावेळी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही अथवा त्यांना सावकराकडे धाव घ्यावी लागते. शेतकऱ्यांची ही अडचण ओळखून केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना अवघ्या 10 मिनिटांत कर्ज पुरवठा होईल. देशातील दोन जिल्ह्यात हा पथदर्शी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. त्यात राज्यातील बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. काय आहे ही योजना, जाणून घेऊयात..

देशातील शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्डच्या मार्फत सहज आणि सुलभ कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बँकांचा जाच कमी करण्यासाठी केंद्राने हे पाऊल टाकले आहे. सध्या देशातील दोनच जिल्ह्यासाठी ह प्रयोग करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील फारुखाबाद आणि राज्यातील बीड जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना अवघ्या दहा मिनिटांत कर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी ॲग्री स्टॅक ॲप मदतीला येईल. या ॲपच्या मदतीने दहा मिनिटांतच 1.5 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. विशेष म्हणजे या कर्जासाठी शेतकऱ्यांना काहीही तारण ठेवावे लागणार नाही. हे कर्ज त्यांना विनातारण मिळेल. प्रायोगित तत्वावर हा प्रयोग राज्यातील बीड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. मे महिन्यापासून याप्रकल्पाचा श्रीगणेशा जिल्ह्यात सुरु होत आहे.

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज देण्यासाठी ॲग्री स्टॅक ॲप विकसीत करण्यात आले आहे. आता देशातील पिकांच्या नोंदणीसाठी सुद्धा एकच ॲप विकसीत करण्यात येत आहे. हा पण एक अनोखा प्रयोग आहे. येत्या खरीप पिकांपासून देशातील सर्व पिकांची माहिती या ॲपमध्ये नोंदविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पिकांची अचूक माहिती शेतकऱ्यांनीच या ॲपच्या माध्यमातून नोंदवायची आहे.