उद्या होणार चर्चा……

सांगली लोकसभा निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीने हिरवा कंदील दाखवला आहे. पण, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची रविवार, दि. ३१ मार्च रोजी बैठक असून, यामध्ये सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीबाबत चर्चा होणार आहे.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परवानगी दिली, तरच सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली.

या बैठकीत सांगली, भिवंडी, मुंबई दक्षिण मध्य तसेच इतर दोन जागांवर चर्चा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून मविआच्या बैठकीत या जागांवरून चर्चा सुरू आहे. सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्येच सांगली लोकसभेची जागा सोडण्याबाबत चर्चा होत होती. पण, या चर्चेत सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहभाग घेतला आहे. नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही तयार आहोत, अशी घोषणा केली आहे.