बिबट्याचा शेळीच्या कळपावर हल्ला; तीन शेळ्या ठार

पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथे बिबटयाच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यातील हि पाचवी घटना असून एकूण १२ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. या बाबत वनविभाग कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याने परिसरातील शेतकऱ्याकडून रोष व्यक्त होत आहे.चोपडेवाडी येथील ग्रामस्थ मृत्यु झालेल्या शेळ्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याच्या तयारीत होते.

परंतु वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आणि उडी मारताना त्याचे केस वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाले. या सर्व पुराव्यावरून त्यांनी हा बिबट्याच असल्याची माहिती दिली. चोपडेवाडीत नागरी वस्तीत राहणारे शहाजी माहदेव माने यांच्या घरामागे गोठा आहे. तिथून त्यांची शेती सुरू होते. त्यांच्या रात्री शहाजी माने यानी तीन शेळ्या गोठ्यामध्ये बांधल्या होत्या. सकाळी उठल्यावर शेळ्यावर बिबट्याने हल्ला करून तीनही शेळ्या ठार केल्याचे निदर्शनास आले. तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्याने शहाजी माने यांचे साधारण ३० हजारांचे नुकसान झाले आहे.

यापुर्वीही चोपडेवाडीतील मोहन गोविंद माने याच्या पाच शेळ्यांवर, माणिक महादेव माने, सतिश माने आणि दिवाणजी माने यांच्या प्रत्येकी १ अशा शेळ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. गेल्या दोन महिन्यातील ही पाचवी घटना असून यामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थांच्यात मोठी घबराट पसरली आहे. पण तरीही वन विभागाकडून कोणतीही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. वन विभागाच्या या कारभारामुळे ग्रामस्थांच्यात वन विभागाबाबत तीव्र नाराजीचा सूर उमठू लागला आहे. वनविभागाने याबाबत गांभीर्याने घ्यावे नाहीतर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा नागरिकानी दिला आहे.