आजी-माजी आमदार, खासदार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशा दिग्गज प्रमुख चौघांतील लढतीमुळे हातकणंगले लोकसभा मतदार संघात कमालीची उत्कंठा आणि चुरस निर्माण झाली आहे. नाट्यमय घडामोडींमुळे मतांच्या आकडेमोडीत सातत्याने होणारे बदल, देश पातळीवर शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या रूपाने पुढे आलेले नेतृत्व आणि यावेळी एकाकी झुंज देण्याची आलेली वेळ, बहुतांश पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी, उमेदवारीवरून नाराजीनाट्य अशा अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या मतदार संघाची निवडणूक उमेदवारांची सत्त्वपरीक्षा पाहणारी ठरेल.
या मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शाहूवाडी, इचलकरंजी व शिरोळ तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. शाहूवाडीत जनसुराज्यचे विनय कोरे, हातकणंगलेत कॉँग्रेसचे राजू आवळे, इचलकरंजीत प्रकाश आवाडे (अपक्ष), शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष), इस्लामपूरमध्ये जयंत पाटील (राष्ट्रवादी), शिराळ्यात मानसिंग नाईक (राष्ट्रवादी) हे आमदार आहेत. हातकणंगलेची निवडणूक ही आजपर्यंततरी दुरंगी स्वरूपाची झाली आहे. यामुळे निवडणुकीचे आडाखे बांधणे सोपे होते.
यावेळी मात्र वाढलेले दिग्गज उमेदवार राजकीय विश्लेषकांना देखील विचार करायला भाग पाडत आहेत. सध्या कोण कोणाबरोबर, आतून कोणाचा पाठिंबा आणि जाहीर पाठिंबा कोण कोणाला देणार यावरून मतांची गोळा बेरीज करण्यात अनेक जण व्यस्त आहेत. हातकणंगलेमध्ये उमेदवारांची वाढती संख्या, अंतर्गत हेवेदावे, गटबाजी, पर्यायी उमेदवार आणि विधानसभेच्या निवडणुकीची आखणी या पार्श्वभूमीवर मतविभागणीचा धोका निर्माण झाला आहे. मतविभागणी कशा पद्धतीने होणार यावर निकालाची चित्र अवलंबून असेल.