हातकणंगले लोकसभा मतदारसंघात रघुनाथदादा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बहुरंगी होत असताना त्यामध्ये शेतकरी नेत्यांची दाटी होताना दिसत आहे. भारतीय जवान किसान पक्षाचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला.त्यांच्यासमवेत निवडक कार्यकर्ते होते.

हातकणंगलेत राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत, जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजी माने अशा शेतकरी नेत्यांमुळे निवडणूक चर्चेत आली आहे. खोत यांनी धैर्यशील माने यांच्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तर अन्य तिघांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. शेट्टी यांच्या नंतर आता रघुनाथदादा पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पोपटराव दाते, जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे, डॉ. प्रगती चव्हाण, विजय पाटील, ज्योतीराम घोडके आदी निवडक कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केलाआपल्या सोबत शेतकरी आणि लष्करी जवानातील कुटुंबीय सोबत असल्याने कोणाचेच आव्हान वाटत नाही, असा उल्लेख करून पाटील इतर उमेदवारांना बेदखल ठरवले.

राजू शेट्टी आणि साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. पाच वर्षे खासदार धर्यशील माने जनतेमध्ये नव्हते. सत्यजित पाटील सरुडकर यांचे वडील कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. सर्व उमेदवारा तुलना करताना खरा शेतकरी नेता मीच आहे, असा दावा त्यांनी केला.