इचलकरंजीत 20 घंटागाड्या बंद अवस्थेत………

महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी खरेदी केलेल्या 68 घंटागाडय़ांपैकी वीस घंटागाडय़ा वर्षभरापासून बंद अवस्थेत असून, याबाबत नियमानुसार मक्तेदार आणि संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी वरिष्ठांकडे केल्यावर प्रशासनाला जाग आल्याचा प्रकार दिसून येत आहे. इचलकरंजी शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी आदर्श फॅसिलिटी ऍण्ड मॅनेजमेंट सर्व्हिसेस, संभाजीनगर या कंपनीला टेंडर दिले आहे.

कंपनीला अटी- शर्ती घालून पाच टिप्पर, दोन रेप्यूज कॉम्पॅक्टर व 68 घंटागाडय़ा या कामासाठी दिल्या. त्याची देखभाल पण मक्तेदार कंपन्यांनी करायची आहे. मात्र, सध्या यापैकी 20 गाडय़ा वर्षभर बंद अवस्थेत आहेत. काही घंटागाडय़ांना हौदाच नाही, तर काही गाडय़ांची चाके पंक्चर आहेत. या चाकासभोवती मोठय़ा प्रमाणात कचरा साठला आहे.