शिवसेना पक्षाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी आज (18 ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत अत्यंत जहरी शब्दात राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली आहे. ‘हे तीन समलिंगी एकत्र आले आहेत (मी राजकीयदृष्ट्या बोलतोय) आणि सत्ता स्थापन केली. त्यामुळे हे समलिंगी सरकार आहे.’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राऊतांनी नेमकी काय केली टीका?
‘जे आम्ही सांगतोय तेच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. यांच्या डोक्यावर लोहाराचे हातोडे पडून देखील त्यांचे डोके ठिकाणावर येत नाही. हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितले आहे.’
‘सर्वोच्च न्यायालयाने काल (17 ऑक्टोबर) एक निकाल दिला की, समलिंगी विवाहाला मान्यता नाही. तोच निर्णय या तीन समलिंगींना लागू होतो. हे मी राजकीयदृष्ट्या बोलतोय. त्यांचं सरकार हे त्याच पद्धतीचं सरकार आहे. जे या महाराष्ट्राला आणि समाजाला मान्य नाही. दोन गद्दारांचे गट एकत्र आले तिसऱ्याने त्यांच्याशी विवाह केला आणि आता ते म्हणतील तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र नव्हता का? आम्ही मूळ पक्ष एकत्र आलो आहोत आणि सरकार स्थापन केलं. हे तीन समलिंगी एकत्र आले आहेत आणि सत्ता स्थापन केली. पुन्हा सांगतो मी राजकीयदृष्ट्या मी बोलतोय.’
‘राहुल नार्वेकर तुम्ही कायदे पंडित आहात, तुम्ही कायदा जाणता. त्यामुळे हा लवाद कायदा पाळत नाही. हे स्वतःला कोण समजतात? यांनाच कायदा कळतो आणि सर्वोच्च न्यायालय मूर्ख आहे असं त्यांना म्हणायचं आहे का?’
‘सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे तो हा लवाद पालन करत असेल लवाद हा सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा नाही. तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करत आहात. सार्वभौमत्व म्हणजे काय चोरांना संरक्षण देणं?, चोरांच्या सरदारांना राजकीय संरक्षण देणे म्हणजे विधिमंडळाचा किंवा संसदेचे सार्वभौमत्व
नाही.’
‘नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या कायद्याच्या पुस्तकातलं मानत नाहीत. ते स्वतःचा पर्सनल लॉ मानतात. पर्सनल लॉवर कायदा चालत नाही.’ असं म्हणत संजय राऊतांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयावर होणाऱ्या विलंबाविषयी अत्यंत कठोर शब्दात भाष्य केलं आहे. संजय राऊतांच्या विखारी टीकेनंतर आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) त्यांना नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
