सुहास बाबर यांची ग्वाही….

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्व नेतेमंडळीनी जोर लावलेला पहायला मिळत आहे. शेवटच्या टप्प्यात अनेक सभा, प्रचार, मेळावे यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहेच. कंबर कसून प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते काम करीत आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठीशी खानापूर- आटपाडी मतदारसंघातील सर्व जनता ताकद एकवटून उभी राहील.

संजयकाका पाटील यांच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी जीवाचे रान करेल, अशी ग्वाही सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तानाजीराव पाटील यांनी दिली. खासदार संजयकाका पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सुहास बाबर म्हणाले, माजी आम. (कै.) अनिलभाऊ बाबर यांनी संजयकाका पाटील यांच्या सांगली लोकसभा मतदारसंघातील विजयाच्या हॅट्रिकसाठी शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तो शब्द आपण पूर्ण करायचा आहे.

या निवडणुकीत सर्वांनी पूर्ण ताकतीने संजयकाका पाटील यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. तानाजीराव पाटील म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्याने कोणताही दुजाभाव न ठेवता ताकतीने काम करायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत संजयकाका पाटील यांना खानापूर- आटपाडी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य देऊन लोकसभेत तिसऱ्या खेपेस आपल्याला विजयी करून पाठवायचे आहे, अशी खूणगाठ प्रत्येक कार्यकर्त्याने बांधली पाहिजे. या मेळाव्यात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मनोगत व्यक्त केले आणि संजयकाका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.