लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यासाठी बहुतांशी एसटी बसेस वापरात आणल्या गेल्या आहेत. सुमारे ७० टक्के बसेस या कामात असल्याने सोमवारी सकाळपासून एसटी प्रवाशांना फटका बसला आहे.ग्रामीण भागातील एसटी व्यवस्था जवळपास बंद आहे. तर महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या लालपरी सुरू असल्या तरी त्याचेही प्रमाण अत्यल्प आहे.
यामुळे नियमित एसटी प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. तर, इलेक्शन ड्युटी अत्यावश्यक असल्याने प्रवाशांना काही काळ संयम राखावा लागेल, असे एसटीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. मतदानाची प्रक्रिया शासकीय पातळीवर राबवली जात आहे. निवडणूक विभागाच्या आदेशानुसार विविध विभागातील यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळातील बसेस या निवडणूक साहित्य केंद्रावर पोहोचवण्यासाठी सोमवारी सकाळपासून बोलवून घेतल्या आहेत.
मतदान केंद्रावरून साहित्य आणण्यासाठी त्यांना उद्या दुपारनंतर पुन्हा पाचारण केले जाणार आहे.कोल्हापूरहून इचलकरंजी, जयसिंगपूर , वडगाव, गडहिंग्लज , गारगोटी, मलकापूर , कागल, पन्हाळा, चंदगड आदि महत्त्वाच्या मार्गांवर एसटी बसेस सुरू आहेत. ग्रामीण भागातील बहुतेक सेवा बंद करण्यात आली आहे. इलेक्शन ड्युटीसाठी बसेस जाणार आहेत याची कल्पना प्रवाशांना नाही. सध्या लग्नसराई आणि मे महिन्याची सुट्टी असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. असे शेकडो प्रवासी बस स्थानकात बस कधी येणार याची प्रतीक्षा करत आहेत. एकीकडे उन्हाचा मारा आणि दुसरीकडे बसेस येत नसल्याने होणारा कोंडमारा प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तासनतास थांबूनही बसेस येत नसल्याने आणि निवडणूक प्रक्रियेसाठी बसेस गेल्याचे माहीत नसल्याने त्यांच्यामध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.