…तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV

लोकसभा निवडणुकीची सर्वात महत्त्वाचा आणि हायव्होलटेज लढत पाचव्या टप्प्यात होणार आहे. 20 मे रोजी मुंबईतील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात अनेक चढ उतार आले असून यामध्ये सर्वाधिक चर्चा राहिली ती म्हणजे भाजप आणि शिवसेनेमधील फूट. त्यानंतर शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे एकनाथ शिंदे यांचं बंड असो किंवा राष्ट्रवादीतील बंडखोरी असो, राज्यातील सर्वसामान्यांनी अनेक राजकीय उलथापालथी पाहिल्या.

त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पवारांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. या एकंदरीत राजकारणातील घडामोडी आणि सभेतून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरीवर शिवसेनेच्या ठाकरे गटातील युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Exclusive) यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी आपलं मत मांडलं. या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले आहेत.

गेल्या 10 वर्षात नक्की घडलंय काय आणि आपल्या देशात अच्छे दिन आले आहेत का? असा प्रश्नार्थक सूर आदित्य यांनी आळवला. चुकून जर आपल्या देशावर भाजपची सत्ता आली तर, हे घरोघरी सीसीटीव्ही लावतील. मग ते तुम्हाला सांगतील की आज मटण, खायचं की मच्छी, की पालेभाजी खायची. तुम्हाला काय घालायच, कुठल्या रंगाच कपडे घालायचे आहेत हेसुद्धा ते सांगतील. मुळात भाजपला आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालंय ते मिटवून देशाचं संविधान बदलून चायनिज काँग्रेस पार्टीच्या देशासारखं आपल्याला करावं लागेल असा खळबळजनक आरोप आदित्य यांनी केला.