निकालानंतर कुणाचा खिसा गरम होणार तर कुणाचा खाली……..

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी चुरशीने मतदान पार पडले. कोल्हापुरात 71.50 तर हातकणंगलेत 71.01 टक्के मतदान झाले आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एक टक्का वाढ इतकी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झाली आहे.

त्यामुळे वाढलेल्या टक्क्याचा धसका उमेदवारांनी घेतला आहे शिवाय आपल्या विजयाची खात्री देखील छातीठोकपणे करत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक इतक्या प्रतिष्ठेची आणि चर्चेची बनली आहे.

राज्यातील राजकारणात झालेली उलथा-पालथ, महायुतीच्या उमेदवारांबाबत असलेली नाराजी, आणि महाविकास आघाडीतून समोर आलेले तुल्यबळ उमेदवार यामुळे यंदाची निवडणूक तितकीच महत्वपूर्ण बनली आहे.दोन्हीही मतदारसंघात तुल्यबळ लढत होत असताना प्रत्यक्षात मतदानात मात्र कार्यकर्त्यांमध्ये अजूनही तितकीच इर्षा आणि उमेदवारा प्रती असलेली निष्ठा पाहायला मिळत आहे.

गावागावातील गल्ली, चौक, पार आणि चावडीवर कोणता उमेदवार निवडून येणार याचीच चर्चा रंगली आहे. केवळ चर्चा रंगली नाही तर पाचशे रुपयांपासून ते एक लाखांपर्यंत पैजा एकमेकांच्या कार्यकर्त्यांनी लावल्या आहेत. पण प्रत्यक्षात 4 जूनलाच या कार्यकर्त्यांचे पितळ उघड पडणार आहे हे नक्की.