उष्णतेच्या लाटेत चक्क गव्हाच्या पोत्याने भरलेला ट्रक पेटला!

राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पुन्हा एकदा उष्णतेच्या झळा सोसाव्या लागल्याचं दिसून येत आहे. मराठवाड्यासह विदर्भात पुन्हा एकदा उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. गेल्या 2 दिवसांपासून येथे सूर्य आग ओकत असून अंगाची लाहीलाही होत असल्याचे दिसून येत आहे. देशात सर्वाधिक  तापमानाची नोंद राजस्थानमध्ये झाली आहे. राजस्थानशिवाय महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच, धुळे,  जळगावमध्ये  उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यात तापमान 44 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. तर, जळगावमध्ये उन्हाच्या कडकाच्या फटक्यात चक्क वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे

जळगाव जिल्ह्यातही सध्या उष्णतेची मोठी लाट पसरली असून या उष्णतेच्या लाटेमुळे वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भवानी माथाजवळ  जळगावजळगावऔरंगाबाद रस्त्यावर अचानक एका ट्रकने पेट घेतल्याचे दिसून आले. या ट्रकमधून गव्हाच्या पोत्यांची वाहूतक करण्यात येत होती. गव्हाच्या पोत्यांनी भरलेल्या या ट्रकला आग लागल्यामुळे उन्हाची तीव्रता लक्षात येईल. दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले, मात्र अग्निशमनची बंब येईपर्यंत ट्रकचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं बोलंलं जात आहे. त्यामुळे, नागरिकांनी दुपारच्या प्रहरात अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्लाही जाणकारांकडून देण्यात येत आहे.