४ जूननंतर जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागत आहे. केंद्रात फिर एक बार मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी धक्का देणार याची चर्चा देशभरात असताना महाराष्ट्रात मात्र ४ जून नंतर कोण कोणत्या पक्षात जाणार?ही चर्चा जोर धरू लागली आहे. शरद पवार गटाचे युवक नेते महेबुब शेख यांनी काल (दि. ३१ मे) अजित पवार गटाच्या संभाव्य फुटीबाबत विधान केले होते. त्यानंतर आज अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनीही खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ४ जूननंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. या दाव्याला भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दुजोराही दिला आहे.