वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत काही ना काही समस्या हि जोर धरतच असते. कधी पाण्याची तर कधी गुन्हेगारी, हाणामारी असे अनेक वादावादीचे प्रश्न असतातच. ज्याचा नाहक त्रास हा नागरिकांना होत असतो. अशातच आता भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याने हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवडाभरापूर्वी घोडा आणि माकडावरील भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना सोमवारी कुत्र्यांच्या कळपाने सुंदरबागेत एका मांजरावर हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली.
या भटक्या कुत्र्यांचा महानगरपालिका प्रशासनाने त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी माणुसकी फौंडेशनचे संस्थापक रवींद्र जावळे व परिसरातील गाळेधारकांनी केली आहे. लहान मुलांसह महिला याठिकाणी विरंगुळा व मनोरंजनासाठी येत असल्याने सुंदरबागेत नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. बागेत विशेषत: लहान मुलांची गर्दी असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रवींद्र जावळे केली आहे.