हातकणंगलेतील तरुणाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक…..

संजयनगर परिसरातील राजीवनगर येथे रागाने बघितल्याच्या व शिवीगाळ केल्याच्या कारणातून तिघांनी तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. मयुरेश यशवंत चव्हाण (वय ३०, रा. शांतिनिकेतन परिसर, मूळ रा. भेंडवडे, हातकणंगले) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. खुनाच्या घटनेने संजयनगर परिसरात खळबळ उडाली. संजयनगर पोलिसांनी संशयित तीनही हल्लेखोरांना अटक केली आहे. प्रतीक रामचंद्र शितोळे (वय २३, शामनगर पाण्याच्या टाकीजवळ, कुपवाड), गणेश जोतीराम खोत (३०, माळी गल्ली, संजयनगर) व सिद्धनाथ राजाराम लवटे (२५, माळी गल्ली, संजयनगर, मूळ रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मयुरेश याच्या खुनात अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोन जणांवर गुन्हे दाखल आहेत. संशयित गणेश खोत याच्यावर कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टचा, तर प्रतीक शितोळे याच्यावर शहर पोलिस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती निरीक्षक कुरळे यांनी दिली.