गणेशखिंड घाटाची सुरक्षा महत्वाची….

गणेश खिंड या घाटातून कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरातील नागरिक वाळवा तालुक्यातील भवानीनगर, ताकारी, इस्लामपूर, क-हाड या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ये -जा करत असतात. हा रहदारीचा घाट असल्यामुळे या घाटाची सुरक्षा महत्वाची आहे.

या घाटात अतिउंच दगडाच्या कडा आहे. सांगली नजकीच्या गणेश खिंडीत दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने सुरू आहेत. या घटनांकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान दरड काेसळण्याच्या घटनांमुळे प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण हाेऊ शकताे.

तरी प्रवाशांनी काळजीपूर्वक प्रवास करणे गरजेचे बनले आहे.सांगलीच्या कडेगाव आणि वाळवा तालुक्याला जोडणाऱ्या गणेश खिंड या अतिवळणाच्या घाटात गेल्या 15 दिवसात 3 वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या.

यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही प्रवाशांसाठी हा धोक्याचा घाट बनल्याचे सध्याचे चित्र आहे. पावसाळयात कडांना पडलेल्या भेगांमध्ये पावसाचे पाणी साठते व भल्या मोठ्या दगडाच्या शिळा वेगाने रस्त्यावर येतात.

या घटना नेहमीच घडत असतात मात्र पावसाळ्यापूर्वी या धोकादायक दगडाच्या शिळा प्रशासनाने काढून घेणे महत्त्वाचे असते. अद्याप तरी प्रशासनाने याबाबत काहीच हालचाली केल्या नसल्याने प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते.