खासदार विशाल पाटील यांनी साधला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा!

लोकसभेत महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारूनही अपक्ष लढून विजयी झालेल्या विशाल पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आपण भाजपाचा पराभव करू शकतो, धनशक्तीचा पराभव करू शकतो. या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे सांगलीतून कळाले. लिंगायत, मराठा, धनगर समाजाने आपल्याला मतदान केले.

या निवडणुकीत सांगली शहरातील मुस्लीम आणि इतर समाजातील लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केले. सांगलीमध्ये जैन समाज, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मागण्या आणि अडचणींकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी आम्हाला मतदान केले, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.

या शहरात मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आहे. ज्याप्रमाणे मराठा समाजाला आणि मनोज जरांगे यांना त्रास दिला, ते मराठा समाजाला आवडलेले नाही. ज्याप्रमाणे वाईट वागणूक दिली. त्याचा बदला मराठा समाजाने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे, अशी टीका विशाल पाटील यांनी केली.

सांगलीतील प्रत्येक जण खासदार म्हणून निवडून आलेला आहे. आता तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क कार्यालय सुरू करणार आहोत, असे विशाल पाटील यांनी सांगितले.