वाळवा तालुक्यातील बहे येथे स्मशानभूमीच नाही. बहे येथे रामलिंग बेट परिसरात नदीकाठी दहनविधी केले जातात. तेथेच रक्षाविसर्जनही केले जाते. त्यामुळे पात्रातील पाणी दूषित होते. याच ठिकाणी गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ दहनविधी केले जात आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्यात दहनविधीवेळी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तर पावसाळ्यात पुलावरील डांबरी रस्त्यावरच दहनविधी उरकावे लागतात. त्यामुळे बहे गावात सर्व सोयीनींयुक्त स्मशानभूमीची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही या सबबीखाली आलेला निधी परत गेला आहे.
स्थानिक नेत्यांच्या कुरूघोडींमुळे येथील स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबितच पडला आहे. आमदार जयंत पाटील यांचे गावात दोन गट आहेत. यांच्यातील अंतर्गत वादामुळे स्मशानभूमीचा प्रश्न कित्येक वर्षे रखडला आहे. आता खासदार धैर्यशील माने यांनी बहे येथील स्मशानभूमीच्या प्रश्नात लक्ष घातल्याने श्रेयवाद रंगणार आहे. गावात आमदार जयंत पाटील यांच्याच दोन गटात समन्वयाअभावी हा प्रश्न प्रलंबित असल्याची उघड चर्चा आहे. आता शिवसेनेचे खासदार धैर्यशील मानेही याप्रश्नी सरसावले आहेत. खासदार निधीतून स्मशानभूमी उभी करणार असल्याचे माने यांनी सांगितले. त्यामुळे जयंत पाटील आणि धैर्यशील माने यांच्यात श्रेयवाद पेटणार आहे.