आटपाडी नगरपंचायत क्षेत्रातील मुख्य व्यापारी पेठेतील रस्ता व गटर कामाबाबत नगरपंचायत कार्यालयात येऊन तक्रारीचा पाढा वाचत मुख्याधिकारी गैरहजर असल्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. याबाबत लोकांनी व्यक्त केलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी सांगितले.
याबाबत मुख्याधिकारी यांनी नागरिकांना लेखी तक्रारी मांडल्यास उचित कारवाई गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असल्याने आटपाडीत उपस्थित राहून संवाद साधता येणार नसल्याने लोकांनी लेखी समस्या, तक्रारी मांडल्यास त्यावर उचित कारवाई केली जाईल, असे सांगत आंदोलन करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी केले आहे. मुख्याधिकायांनी नागरिकांची दखल घेतल्याबद्दल डॉ. श्रीनाथ पाटील, मकरंद चव्हाण व नागरिकांनी आभार मानत समस्यांची सोडवणूक गतीने करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
आटपाडी पेठेमधील वरदान मेडिकल ते दौंडे कलेक्शन दुकानापर्यंत गटारीचे काम पूर्ण झाले असल्याने त्या ठिकाणच्या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करणेबाबत कामाच्या कार्यान्वित यंत्रणेस म्हणजेच उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना कळविले आहे. ज्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन काम करताना तोडले आहे ते काम पूर्ण होताच तत्काळ जोडण्यास ठेकेदारास कळविल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. विटा नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून पूर्णवेळ कार्यभार असल्याने अतिरिक्त कारभार असलेल्या आटपाडीत नियमित उपस्थित राहता येत नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी मकरंद चव्हाण यांना दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे.