शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची जयंत पाटीलांची विधानसभेत मागणी….

बळजबरीने बुलडोझर चालवून विकास केला जात असेल तर तो विकास काय कामाचा असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करताना ते विधानसभेत बोलत होते. आमदार पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग सध्या चर्चेचा विषय आहे. १२ जिल्ह्यांतून जाणारा महामार्ग आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची २७ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे.

नागपूर-गोवा महामार्गासाठी जिल्ह्यातील शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळज, सिद्धेवाडी, अंजनी, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकी, नागाव कवठे, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी आदी गावांतील पाच हजार शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. तासगाव, कवठेमहांकाळ व आटपाडी तालुक्यांत सिंचन योजना अलीकडेच पूर्ण झाल्या असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी जमिनी स्वभांडवलावर विकसित केल्या आहेत.

त्यांचा फारच तोटा होणार आहे. काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. मिरज तालुक्यातील गावांना महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्‌भवणार आहे. या महामार्गासाठी कर्नाळपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर जाईल आणि ते परत लवकर हटणार नाही. याचा फटका सांगली शहर व परिसरातील गावांना बसणार आहे.

कृष्णा व वारणा नदीला महापूर आल्यास वारणेच्या फुगवट्यामुळे कृष्णेचे पाणी हरिपूर रोडवरील नाल्यातून बाहेर पडून ते अंकलीच्या हद्दीतून परत नदीत जाते, मात्र रत्नागिरी-नागपूर महामार्गामुळे तिथे देखील पाणी आडणार आहे. त्यामुळे हा प्रस्तावित महामार्ग रद्द करावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.