विधानसभा आचारसंहितेपूर्वी कबनूर नगरपरिषदेचा मुद्दा निकाली निघणार की लांबणार?

इचलकरंजी महानगरपालिकेलगत ७० हजार लोकसंख्या असलेल्या कबनूर गावात ग्रामपंचायत असून, त्याचा कारभार ग्रामसेवक चालवतो. आमदार आवाडे यांनी ५० हजार लोकसंख्येनंतर त्या गावची नगर परिषद करण्याचा कायदा असल्याचे मत मांडले व कबनूरला स्वतंत्र नगर परिषद करण्याची मागणी केली. नागरिकांना मूलभूत सोयी- सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायतीस मर्यादा येतात म्हणून कबनूर स्वतंत्र नगर परिषद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आमदार प्रकाश आवाडे अधिवेशनात मांडत आहेत.

यावेळीही कबनूर नगर परिषदेचा मुद्दा निकाली निघणार की लांबणार, याची चर्चा आहे. त्यांच्या या मागणीवर आवाडे यांचे समर्थन असलेले सत्ताधारी शासन काय निर्णय घेणार, यासाठी लक्ष लागलेले आहे. दरम्यान, आमदार आवाडे यांनी कबनूर नगर परिषद करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना यापूर्वी दि. २६ जानेवारी व नंतर लोकसभेच्या अधिसूचना
आचारसंहितेपूर्वी काढण्याची हमी दिली होती. त्यामुळे विधानसभा आचारसंहितेपूर्वी तरी कबनूरची नगर परिषद होईल का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.