महायुती सरकारने इतक्या योजना दिल्या आहेत. आता घरात जेवण करायला सांगा तेही आम्ही करू, असे वक्तव्य अजित पवार गट राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केल्याचे पाहायला मिळाले. मात्र मतदान फक्त आम्हालाच करा, असं आवाहन देखील हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यातून जनतेला केलं आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी केलेल्या या मिश्किल वक्तव्यानंतर शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील सरकारला उपरोधिक टोला लगावला आहे.
‘हे उद्या अंघोळ घालायलाही घरी येतील’, असं म्हणत मुश्रीफांच्या वक्तव्यावर बोलताना जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला. ‘केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डवर मोफत धान्य देणं सुरू आहे. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोर-गरिबांना आनंदाचा शिधाही देण्यात येत आहे. एवढ्या योजना महिलांसाठी आणल्यानंतर आता फक्त तुमच्या घरात जेवण करायला सांगा तेही करू पण मतदानाला महायुतीच्य उमेदवारासमोरील बटणं तेवढी कचाकचा दाबा’, असं म्हणत हसन मुश्रीफांनी जनतेला महायुतीला मतदान करण्याचं आवाहन दिलंय.