हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी व त्यांचे विचार सदैव तेवत ठेवण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात येणारी मशाल मिरवणूक आजच्या तरुणाईला आदर्शवत आहे. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या ज्ञात-अज्ञात शूरवीरांच्या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात येणारी हुपरीतील ही मशाल मिरवणूक देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या शक्तिशाली बलिदानाची एक आठवण आहे.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांच्या नियोजनात अखंडितपणे सुरू असलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याची भावना जिल्हा पोलीसप्रमुख महेंद्र पंडित यांनी व्यक्त केली. शिवसेना युवासेना आयोजित हुपरीतील मशाल मिरवणुकीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव, माजी खास श्रीमती निवेदिता माने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोकराव माने व सैनिक टाकळी ता. शिरोळ येथील सेवानिवृत्त सैनिक प्रमुख उपस्थित पंडित यांच्या हस्ते मशाल पूजन करून प्रज्वलित करण्यात आली.