इचलकरंजीसह हातकणंगले, शिरोळमध्ये ठाकरेंच्या स्वबळाच्या तयारीसाठी होणार दमछाक

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला मताधिक्क मिळाले आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेले चित्र पहायला मिळत आहे. अनेक पक्षांनी स्वबळाचा नारा हाती घेतलेला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या ठाकरे सेनेने आगामी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. मात्र स्वबळासाठी शिलेदारांची जमवाजमव होणार कशी, असा प्रश्न उभा राहिलेला आहे. २०१९ ला राज्यात महायुतीला जनाधार मिळाला. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्रीपदाचा पेच तयार करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय बहुतांशी शिवसैनिकांना रुचला नव्हता. अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाले.

अनेक शिवसैनिकांनी शिंदे यांना साथ दिली. त्यानंतरही ठाकरेंसोबत राहिलेले अनेक शिवसैनिक सोयीनुसार बाहेर पडले. विधानसभा निवडणुकीत याचा ठाकरे यांना फटका बसला. इचलकरंजी शहराचा विचार करता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच समर्थक ठाकरे यांच्याकडे शिल्लक राहिले आहेत. हातकणंगलेत यापेक्षा वेगळे चित्र नाही. लढावू सैनिक म्हणून ओळख असलेले जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले. तर माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर राजू शेट्टी यांना जावून मिळाले. शिरोळमध्येही वेगळेच चित्र आहे.

माजी आमदार उल्हास पाटील यांनी शेट्टी यांचे पुन्हा एकदा नेतृत्व मान्य केले. ग्रामीण भागात यापेक्षा वेगळे चित्र नाही. त्यामुळे या तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरे यांना नव्याने कार्यकर्ते उभे करावे लागणार आहेत. या परिस्थिती इचलकरंजी महापालिका, शिरोळ, पेठवडगाव, कुरूंदवाड, जयसिंगपूर, हुपरी नगरपालिका, हातकणंगले नगरपंचायत त्याच बरोबर या तीन विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद १९ तर पंचायत समितीचे ३९ मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात ठाकरे सेनेची स्वबळाच्या तयारीसाठी दमछाक होणार असल्याचे चित्र दिसत आहे.