33 एकरात लावला कांदा! बीडच्या शेतकऱ्याच्या धाडसाची गावभर चर्चा…

बीडसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात बघाल तिथे कांदा असं चित्र दिसणं तसं कठीणच. सोयाबीन, बाजरी, चारा अशी पारंपरिक शेती करणाऱ्यांचंच प्रमाण अधिक. कांदा निर्यातशुल्कामध्ये कांद्यांचे भाव घसरल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. इथून पुढं एक दोन एकरात तरी कांदा लावायचा का नाही अशा संभ्रमात शेतकरी असताना बीडमधील एका तरुण शेतकऱ्याने त्याच्या तब्बल ३३ एकराच्या शिवरात फक्त कांद्याचीच लागवड करून टाकलीये.

पंकज पठाडे या युवा शेतकऱ्यानं  १५ लाख रुपये खर्च करून तब्बल ३३ एकरावर कांदा लागवड केली आहे. मागील दहा दिवसांपासून आष्टीच्या या शेतकऱ्याच्या शेतावर १०० हून अधिक महिलांसह आणि अनेक मजूरांची रेलचेल आहे. जून महिन्यात सात आठ एकरांसाठी तयार केलेल्या कांद्याच्या रोपांची लागवड करण्यात हे सगळे मजूर सध्या व्यस्त आहेत. या शेतकऱ्याला ९० लाख रुपयांची अपेक्षा असून कांदा पिकाकडून सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीच आशा सोडल्याचे चित्र असताना बीडच्या या तरुणाच्या धाडसांचं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही नवल वाटतंय.

मजुरांना रोजचा खर्च द्यायचा म्हटला तरी आठवड्याचा खर्च ७० ते ८० हजाराच्या घरात जाणारा. सिंचनासाठी या शेतकऱ्याने शिवारात ड्रिप बसवले आहे. त्यासाठी साधारण ८ ते १० लाख खर्च आला असून आतापर्यंत असा १८ ते २० लाख रुपये या शेतकऱ्याचा एकूण खर्च आहे. यातून त्याला साधारण ९० लाख रुपये कमाईची अपेक्षा आहे. शेतकऱ्याच्या धाडसाचं फळ त्याला मिळतंय का? हे येणारा काळच ठरवेल.