बारामती म्हटलं की शरद पवार आणि शरद पवार म्हटलं की बारामती हे समीकरण मागच्या 50 वर्षांहून अधिक काळ रुढ आहे. बारामतीत शरद पवारांचं निर्विवाद वर्चस्व राहिलंय. मात्र, 50 वर्षात पहिल्यांदाच शरद पवारांना बारामती तालुक्यात मोठा धक्का बसला आहे .
ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती वर्चस्व मिळवत अजित पवार गटानं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार गट थेट आमनेसामने आले होते. मात्र, अजित पवार गटानं बारामतीवर एकहाती वर्चस्व मिळवल आहे. शरद पवारांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीचा हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.
शरद पवार गटाचा एकही उमेदवार जिंकला नाही
बारामतीत अजित पवार गटाने मोठी मुसंडी मारली आहे. बारामती तालुक्यात एकूण 32 ग्रामपंचायतींचा निकाल लागला. बारामतीमधील 30 ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार गटाने विजय मिळवला आहे. शरद पवार गटाचा एकदी उमेदवार विजयी झालेला नाही. शिंदे गट आणि ठाकरे गटाचे उेमदवार देखील पराभूत झाले आहेत. तर, दोन जांगावर भाजपने विजय मिळवला आहे.
अजित पवारांचं मूळगाव असणा-या काटेवाडी ग्रामपंचायतीतही अजित पवारच दादा राहिलेत. काटेवाडीत अजित पवार गटाने एकूण 17 ग्रामपंचायतींमध्ये आपला गुलाल उधळला. तर, येथील एक ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली आहे.
अजित पवार गटाकडून शरद पवार गटाचा सुपडा साफ
बारामती तालुक्यावर अजित पवारांचं एकहाती वर्चस्व राहिलं आहे. शरद पवार गटाचा सुपडा साफ झाला. त्याचवेळी इतिहासात पहिल्यांदाच 2 ग्रामपंचायतीत भाजपचे सरपंच निवडून आले. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जिथे अजित पवार कुटुंबानं मतदान केलं त्या वॉर्डातच अजित पवार गटाचा पराभव होत अपक्ष उमेदवार निवडून आलाय.
भाजप विरोधात असताना कधीही भाजपचे सरपंच बारामतीतून निवडून आले नव्हते. मात्र, आता भाजपसोबत अजित पवार सत्तेत आहेत, त्याचवेळी भाजपनं दादांच्या पॅनलविरोधात लढून दोन जागांवर सरपंच निवडून आणलेत. त्यामुळे नवी राजकीय समीकरणं बारामतीत तयार होताना दिसत आहे.