प्रत्येक गावात नेमण्यात येणार योजनादूत! ऑनलाईन अर्ज सुरु

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूत नेमण्यात येणार असून राज्यात ४६ हजार तर सोलापूर जिल्ह्यात ८६५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.७ सप्टेंबर २०२४ पासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरु झाली असून येत्या १३ सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. सोलापूर जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत ८६५ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत.

जिल्ह्यात एकूण १५७३ योजनदुत नेमले जाणार आहेत. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आप आपल्या गावात योजनेचे काम करण्यासाठी उपरोक्त नमूद संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.