लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला फटका बसला. त्यामुळे महायुती सरकारने अनेक योजनांचा बार उडवला. त्यामुळे योजना सगळ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत निवडणुका लांबणीवर जाणार अशी चर्चा रंगली आहे.पण आता निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आयोगाची एक टीम महाराष्ट्रात येणार असून निवडणुका वेळेवरच होणार अशी शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू असून ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निश्चित कार्यक्रम तयार केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची टीमचा महाराष्ट्र दौरा निश्चित झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही टीम महाराष्ट्रात येणार आहे. या टीममध्ये, 10 ते 12 केंद्रीय निवडणूक आयोग प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभा कार्यकाळ संपण्याआधीच निवडणुका होणार आहेत, असं केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे 26 नोव्हेंबरआधी महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात येईल. म्हणजेच दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात निवडणुका होतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे.