हाळवणकरांसोबतच्या मतभेदला पूर्णविराम; प्रकाश आवाडे

इचलकरंजी येथे शहर भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा आयोजित केला असला, तरी त्यास आमदार आवाडे यांना निमंत्रित केले नसल्याने त्याची चर्चा होती. मात्र, या मेळाव्यानंतर बावनकुळे यांच्यासह निमंत्रित नेत्यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. यानंतर आमदार आवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा आवाडे – हाळवणकर यांच्यातील वादाकडे लक्ष वेधले. आमदार आवाडे म्हणाले, की आमच्यातील वाद आता संपले आहेत. दोन्हीकडील कार्यकर्त्यांचे शंभर टक्के मनोमिलन होईल.

निवडणुकीला भाजप – ताराराणी पक्ष असे एकत्रित सामोरे जाणार आहोत. जिल्ह्यात भाजप अतिशय ताकतीने लढून जिंकेल. चांगल्या मताधिक्याने राहुल आवाडे निवडून येतील. राहुल आवाडे म्हणाले आजच्या मेळाव्याचे निमंत्रण नव्हते; पण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा घरी येण्याचा दौरा ठरलेला होता. राज्यात महायुतीचे सरकार येणे गरजेचे असल्याने सर्वजण एका विचाराने आलो आहोत. गैरसमज असतील, ते एकत्र बसून सोडवू. आम्ही केवळ या निवडणुकीपुरते नव्हे, तर कायमस्वरूपी एकत्र आलो आहोत.