इचलकरंजी विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे (Rahul Awade) विजयी झाले आहेत. हिंदूत्ववादी एकगठ्ठा मते पडल्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला. या ठिकाणी विरोधी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मदन कारंडे यांनी मराठा कार्ड बाहेर काढले होते.
शिवाय, मतदार संघात मोठ्या प्रमाणात हक्काची मुस्लीम मते होती. मात्र, मराठा – मुस्लिमांची मते त्यांना विजयापर्यंत घेवून जावू शकली नाहीत. त्यामुळे एम-एम फॅक्टर यशस्वी झाला नाही. तर, लाडक्या बहिणींची मते राहूल आवाडे यांनाच मिळाल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे.या निवडणुकीत परस्पर विरोधी कार्यकर्त्यांमध्ये टोकाची इर्षा दिसून आली. पण, आवाडे यांनी प्रथमच विरोधी उमेदवारांवर फारशी वैयक्तीक टीका करणे टाळले. त्या ऐवजी आतापर्यंत केलेल्या कामांचा ऊहापोह केला. तसेच केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यावर भर दिला.
काही प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. त्याचाही या निवडणुकीत फायदा झाल्याचे दिसत आहे. तर, जरांगे फॅक्टरचा फारसा प्रभाव दिसून आला नाही.इचलकरंजीतील राजकारणांवर नेहमीच आवाडे घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे पहिल्यांचा आमदार झाले. त्यानंतर प्रकाश आवाडे हे पाचवेळा आमदार झाले.
तीन वेळा ते पराभूतही झाले आहेत. यामध्ये दोनवेळा हाळवणकर यांनी तर एकदा माकपचे कै. के. एल. मलाबादे यांनी त्यांना पराभूत केला होता. आता आवाडे घराण्यातील तिस-या पिढीतील राहूल हे प्रथमच आमदार झाले आहेत. यापूर्वी ते जिल्हा परिषद सदस्य होते.
इचलकरंजी मतदारसंघात राहुल आवाडे 56,811 मताधिक्यांनी विजय झाले आहेत.