निरामय रिंग रोड वाहतुकीसाठी धोकादायक, वाहनचालकांची गैरसोय…

कृष्णा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी आमराई रोडवरील श्री ज्ञानेश्वर मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. विद्यार्थ्यांसाठी तर हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना दिले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जुना सांगली नाका हा रिंग रोड अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे.

जुना सांगली नाका येथून हा रस्ता पुढे आमराई, डीकेटीई शैक्षणिक संकुलाकडे जातो. या मार्गावर श्री ज्ञानेश्वर मंदिर आहे. या मंदिरापासून ते डॉ. आंबेडकर पुतळा या रिंग रोडवर कृष्णा योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. त्यानंतर मात्र त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्याला तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

अनेक ठिकाणी उंच-सखल भाग झाला आहे. त्यामुळे वाहतुकीला अत्यंत त्रासदायक असा हा मार्ग झाला आहे.या रस्त्यावर गावभाग पोलिस ठाणे, सेवासदन-निरामय हॉस्पिटल, शिक्षक कॉलनी, कामाक्षी रेसिडेन्सी यांसह अनेक शिक्षण संस्था आहेत. अत्यंत वर्दळीचा हा मार्ग आहे. अवजड वाहनांचीही सतत ये-जा असते; पण खराब रस्त्यामुळे या मार्गावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. विशेषतः दुचाकीस्वारांची तर मोठी कसरत होते.

राजवाडा चौक मार्गाची दुरवस्था लक्षात घेऊन अलीकडे वाहनांची वर्दळ राजवाडा चौकमार्गे वाढत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण पडत आहे. याचा विचार करता तातडीने श्री ज्ञानेश्वर मंदिर ते निरामय रिंग रोडचे डांबरीकरण करावे व वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी मुसळे यांनी निवेदनात केली आहे.