हातकणंगलेत चार-पाच दिवसांतून पाणी पुरवठा; नागरीकांत संताप 

पंचवीस वर्षापूर्वी हातकणंगले आणि नेजसाठी पाणी पुरवठा योजना तत्कालिन पाणीपुरवठा मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी मंजूर केली. त्यावेळी नेजसाठी दिवसाकाठी तीन तास तर हातकणंगलेसाठी २१ तास पाणी घेण्याचे ठरले. कालांतराने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामध्ये नेजसाठी ६ आणि हातकणंगलेसाठी ३८तासांचा ठराव करण्यांत आला. मात्र आता नेज सुमारे तेरा तास पाणी वापरत असल्यामुळे हातकणंगलेकरांना चार ते पाच दिवसांनी पाणी मिळत आहे. त्यातही कधी वीज गेली, लिकेज आहे किंवा मोटर बंद पडली अशा या ना त्या कारणाने वारंवार पाणी पुरवठा बंद असतो.

वर्षाकाठी १२०० रुपये पाणी पाणीपट्टी आकारली जात असताना व नदीत मुबलक पाणीसाठा असतानाही वर्षातून ३६५ दिवसांपैकी फक्त १०० च दिवस पाणी मिळत असल्याने नागरिकांतून या व्यवस्थेविरोधांत संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून हातकणंगले शहराला चार ते पाच दिवसांतून एकदा किंवा आठवड्यांतून एकदाच पाणी येत आहे.

पूर्वी एक दिवसांआड येणारे पाणी आता चार – पाच दिवसांवर गेल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. यावर लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन कोणीच उपाय शोधणार नसतील तर त्यांना निवडून देऊन काय फायदा ? असा सवालही नागरिकांतून उपस्थित होत आहे.