दुचाकीस्वार आणि सहप्रवासी यांचे अपघात अन् त्यात मृत्यूमुखी, तसेच घायाळ होणार्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे राज्यातील सांगलीसह प्रमुख ४५ शहरांमध्ये दुचाकीस्वारांसह सहप्रवाशालाही शिरस्त्राण (हेल्मेट) बंधनकारक केले आहे.याविषयीचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीनंतर त्वरित हा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना शिरस्त्राणाची सक्ती करण्याविषयी रोष व्यक्त केला जात आहे. सध्या विनाशिरस्त्राण वाहनचालकांवर सीसीटीव्हीद्वारेही कारवाई केली जात आहे.
दुचाकीस्वार आणि सहप्रवासी यांनी दुचाकी चालवत असतांना शिरस्त्राण वापरणे बंधनकारक आहे. विनाशिरस्त्राण दुचाकी चालवल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंड, तसेच ३ महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.