हातकणंगले विधानसभा मतदारसंघात गतवेळी पराभव होऊनही दुसऱ्या दिवसापासून आमदार म्हणून दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू यांनी पाच वर्षे ताकदीने मतदार संघात संपर्क ठेवला. त्यांच्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या सर्वच कार्यकत्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी, शिरोळची नावे हातकणंगले तालुक्यात घुसडू नयेत, अशी माफक अपेक्षा निवडणुकीत पायाला भिंगरी बांधून प्रचार केलेल्या एकनिष्ठ कार्यकत्यांची आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापण झाल्यानंतर त्या पाठोपाठ तालुका व जिल्हास्तरीय समित्या आणि जिल्हा नियोजन कमिटीची फेररचना होणार असल्याने इच्छुकांनी आतापासूनच वशिला लावण्यास सुरुवात केली आहे.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या घटक पक्षांचा कोटा निश्चित नसला तरी हातकणंगले विधानसभा मतदार संघात जनसुराज्यला सर्वाधिक वाटा मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच बसवण्णा खिंड येथील दे.भ. रानाप्पाण्णा कुमार सुतगिरणीवर वर्दळ वाढविली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार स्थापण झाल्यानंतर महामंडळ आणि बहुतांशी समित्या रिक्तच राहिल्या होत्या. केवळ संजय गांधी निराधार समिती आणि जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त्या झाल्या होत्या.
आता सरकार स्थापण झाल्यानंतर त्यापाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यामुळे सरकारकडून वेळ न घालविता पुन्हा निवडणुकीच्या कामाला लावण्यासाठी या समित्यांच्या नियुक्त्या तातडीने होणार आहेत. त्यामुळेच कार्यकत्यांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.