भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने दमदार कमबॅक केलं आहे.सध्या ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. दुसरा कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधण्यासह भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याचा मार्ग आणखी खडतर केला आहे. भारताला पुढील सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे पुढील सामन्यात भारतीय संघाला ४ बदल करावेच लागतील.

रोहित शर्माने सलामीला यावं
मालिकेतील पहिल्या कसोटीत केएल राहुल सलामीला फलंदाजीला आला होता. या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी रोहितने केएल राहुलला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसला. तर मध्यक्रमात फलंदाजीला आलेल्या रोहितलाही हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुढील सामन्यात रोहितने सलामीलाच फलंदाजीला यावं.

राणाला बसवावं लागेल
मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये हर्षित राणाला संधी दिली गेली होती. मात्र त्याला या संधीचा फायदा घेता आलेला नाही. पहिल्या डावात त्याने गोलंदाजी करताना १६ षटकात ८६ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याला एकही गडी बाद करता आला नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा किंवा आकाशदीपला संधी दिली जाऊ शकते.

आर अश्विनला बसावं लागेल
मालिकेतील पहिल्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली गेली होती. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अश्विनला संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र दोघांनाही आपली छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे रोहित जडेजाला संधी देऊ शकतो. फिरकी गोलंदाजीसह तो फलंदाजीतही मोलाचं योगदान देऊ शकतो.
फलंदाजांना जबाबदारीने खेळावं लागेल
मालिकेतील पहिल्या सामन्यातील दुसरा डाव वगळला, तर उर्वरीत ३ डावात कुठल्याही भारतीय फलंदाजाला अर्धशतकाचा पल्ला देखील गाठता आलेला नाही. भारताला जर पुढील सामना जिंकायचा असेल, तर आपल्या फलंदाजीवर भर द्यावा लागेल.