जिल्हापरिषदेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव तक्रारीचे गाव म्हणून रेंदाळ गाजलेले आहे. रेंदाळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. प्रचंड अंतर्गत कलह वाढला आहे. पडद्याआड राहून काही सल्लागार याची सुत्रे हालवित असल्याची जोरदार चर्चा सुरू असून यामुळे व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. तरीही आघाडीचे नेते कुठे आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी गटात ताळमेळ नसल्याने विरोधकांची करमणूक तर नागरिकांची गैरसोय होत आहे. मत मागण्यासाठी जनतेसमोर टाहो फोडलेल्या आघाडीच्या नेत्यांनी आता उघड संघर्ष व सोशल वॉर थांबवून गावची इभ्रत वाचवावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे. सत्ताधारी गटातील टोकाचा संघर्ष आणि खालच्या पातळीवर सुरू असलेले राजकारण अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपले आहे, असे लोक उघडपणे बोलत आहेत.
विकासनिधी खर्चावर मासिक मिटिंगमध्ये एकमत होत नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. ही दुर्दैवी घटना आहे. मासिक मिटिंगच्या प्रोसिडींगला सदस्यांच्या सह्या होत नाहीत. मिटिंग रद्द होते. गावसभा बऱ्याच वेळा कोरम अभावी तहकूब होते. नागरिक इकडे खरोखरच पाठ फिरवितात का त्यांचे मत विचारात घेतले जात नाही हा संशोधनाचा विषय असून गावच्या प्रगतीच्या दृष्टीने चिंतनीय बाब आहे. आघाडीत बिघाडी असेल तर जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पायाभूत नागरी सुविधा कशा देणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. करवसुली थंडावली आहे. सत्ताधारी सदस्यांच्या अंतर्गत बंडामुळे व्यवस्थापन कोलमडून गेले आहे. सातत्याने येणाऱ्या प्रत्येक ग्रामसेवकावर लोकप्रतिनिधींचा प्रचंड दबाव वाढला आहे. यामुळे ग्रामसेवक रेंदाळ गावांत यायला राजी होत नाहीत, आतापर्यंत पाच ग्रामसेवक झाले ही शोकांतिका आहे. प्रशासनाची ही खुर्ची संगीत खुर्ची झाली आहे.
नोटरी दस्तावेजांच्या नोंदी घालतो म्हणून एका कार्यकर्त्यांने छापील अर्जावर नागरिकांची गोपनिय माहिती भरुन घेतली आहे. याचे बेकायदा दप्तर कोणाच्या तरी घरात असल्याचे लोक उघडपणे बोलत आहेत. चुकिच्या पद्धतीने कामकाज करण्यासाठी ग्रामसेवकावर दबाव तरी नसेल ना अशी शंकेची पाल नागरिकांच्या मनात चुकचुकत आहे.