नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये 2024 – 25 च्या पुरवणी मागण्यांवर पिक विमा विषयावर आमदार सुहास भैया बाबर यांनी आपली मागणी मांडली. खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे, पाणी माती परीक्षण केंद्र, कृषीचे पेंडींग लकी ड्रॉ, ट्रॅक्टरला दोन लाख अनुदान यासह मतदारसंघात खिलार जनावर संवर्धन केंद्र उभे करावे अशा मागण्या हिवाळी अधिवेशनात आमदार सुहास भैया बाबर यांनी मांडल्या.
ते म्हणाले, सध्या तालुकास्तरावर प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी पर्जन्यमापक केंद्रे आहेत. परंतु अवकाळी पाऊस जर पडला तर विमा कंपन्या मंडळाच्या ठिकाणी पडलेला पाऊस ग्राह्य न धरता गावात किती प्रमाणात पाऊस पडला याची माहिती घेऊन पीक नुकसानीची भरपाई बाबत प्रस्ताव घेतात. त्यामुळे तशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम देण्यासाठी पिक विमा कंपनी टाळाटाळ करतात. कधी कधी ही रक्कम मिळण्यासाठी या कंपन्यांबरोबर शेतकऱ्यांची संघर्षाची स्थिती देखील निर्माण होते. हे टाळण्यासाठी मंडळाच्या मुख्य ठिकाणांबरोबरच प्रत्येक गावात पर्जन्यमापक केंद्रे बसवावेत जेणेकरून कोणत्या परिसरात किती पाऊस पडला आहे याची नोंद होईल व अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याची माहिती कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाला देखील मिळू शकेल.
खानापूर तालुक्यात पाणी परीक्षण, माती परीक्षण केंद्रे राज्य शासनाने उभारावेत, कृषी विभागाचे लकी ड्रॉ गेल्या दोन वर्षांपासून पेंडींग आहे ते लवकरात लवकर निघावेत. ट्रॅक्टरला दोन लाख किमान अनुदान द्यावे खानापूर आटपाडी किंबहुना संपूर्ण मानदेशामध्ये खिलार जनावरांची पैदास होते राज्याच्या गोशाळा संवर्धन योजनेमध्ये खानापूर मतदारसंघात खिलार जनावर संवर्धन केंद्र उभा करावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.