वाळवा तालुक्यातील पेठ येथील जनाई गार्डनमध्ये शिराळा मतदारसंघात येणाऱ्या वाळवा तालुक्यातील 48 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि या मेळाव्यात मानसिंगराव नाईक यांनी कार्यकर्त्यांना आवाहन देखील केलेले आहे. विधानसभेतील पराभवाने खचून न जाता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदारसंघात ताकद कोणाची हे विरोधकांना दाखवून देण्याच्या जिद्दीने कार्यकर्त्यांनी तसेच नेते मंडळींनी कामाला लागावे असे आवाहन केले आहे.
मानसिंगराव म्हणाले, निवडणुकीत जय पराजय हा ठरलेला असतो. पराजयातून खूप काही शिकायचे असते मात्र हा पराजय न पटणारा आहे. ईव्हीएमवर संपूर्ण देशात शंका व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर राबविलेल्या योजनांमुळे एवढा मोठा फरक पडू शकत नाही म्हणून विरोधकांना उघडे पाडण्यासाठी येणाऱ्या पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत आपली ताकद दाखवावी. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू असे त्यांनी आवाहन केले.