सध्या सगळीकडेच उसाचा गळीत हांगाम सुरु झालेला आहे. अनेक भागात ऊसतोड मजूर कमतरता यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच ऊस दरवाढीचा प्रश्न देखील चालूच आहे. खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील भारती शुगर्स कारखान्याचे कामकाज माजी मंत्री विश्वजित कदम आणि ज्येष्ठ नेते वनश्री मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कारखान्याने नोव्हेंबरअखेर गाळपास आलेल्या उसाचे बिल प्रती टन ३,००० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक आणि आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी दिली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहून आमची वाटचाल सुरू आहे असे ते म्हणाले. महेंद्र लाड म्हणाले की, गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये नोव्हेंबर महिन्याअखेर गाळपास आलेल्या उसाचे बिल प्रतिटनास ३,००० रुपयांप्रमाणे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. यावर्षी कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गळितास आणण्यासाठी सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणाही जोमात कार्यरत आहे. संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा. भारती शुगर्सचे अध्यक्ष ऋषिकेश लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील आदी उपस्थित होते.